उद्योग-व्यवसाय क्षेत्रात मराठा समाजाची ताकद वाढविण्यासाठी उद्योजकांनी एकत्र येण्याचे आवाहन
कोल्हापूर : उद्योग-व्यवसायातील संधींचा सामूहिकपणे लाभ घेण्यासाठी मराठा उद्योजकांनी परस्परांमध्ये संवाद आणि विश्वास वाढवून एकमेकांच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे. संघटित प्रयत्नांतून उद्योग क्षेत्रात समाजाची ताकद वाढवून आर्थिक सक्षमीकरण साधण्याचा निर्धार मराठा उद्योजकांनी व्यक्त केला. ‘मराठा एंटरप्रेन्युअर्स असोसिएशन’ (एमईए)च्या कोल्हापूर चाप्टरच्या सदस्यत्व नोंदणी मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी धैर्यप्रसाद हॉल येथे झाला. यावेळी पुणे एमईएचे अध्यक्ष विक्रम गायकवाड, कोल्हापूर चाप्टरचे अध्यक्ष जयेश कदम, सचिव विद्यानंद बेडेकर, सुनील झाल्टे, कोषाध्यक्ष राजू पाटील, राजीव लिंग्रस, मंगेश पाटील आणि डॉ. अभिजित कोराणे प्रमुख उपस्थित होते.
हे ही वाचा…
‘माधुरी’ हत्तीणीचा ४०९ दिवसांनी मठाकडे परतीचा प्रवास सुरू; आज नांदणीत पुनरागमन
मराठा समाजाची पारंपरिक नाळ शेतीशी जोडलेली असल्याने उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील सहभाग तुलनेने मर्यादित राहिला. मात्र, अलीकडच्या काळात समाजातील तरुणांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आता उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातही संघटितपणे पुढे जाण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. विक्रम गायकवाड म्हणाले, काळाची पावले ओळखून मराठा समाजाने बदल स्वीकारण्याची गरज आहे. उद्योजकांनी एकमेकांवर विश्वास ठेवून संवाद वाढविल्यास उद्योग-व्यवसायाच्या विस्ताराला निश्चितच फायदा होईल. एमईए ही अनुभवी उद्योजक आणि नवउद्योजक यांना जोडणारा सेतू म्हणून काम करेल. त्यामुळे उद्योगवाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि बळ मिळेल.

जयेश कदम म्हणाले, शेती, समाजकारण आणि राजकारणात मराठा समाजाने आपला ठसा उमटविला आहे. आता उद्योग-व्यवसाय क्षेत्रातही सशक्त होण्याची वेळ आली आहे. भांडवल आणि बाजारपेठेच्या अडचणींशी प्रत्येकाने स्वतंत्रपणे लढण्याऐवजी एकत्रितपणे त्यावर मार्ग काढल्यास व्यवसायात यश मिळू शकते. सचिव विद्यानंद बेडेकर यांनी प्रास्ताविक केले. अजिंक्य शिंदे, अभिजित कोकाटे आणि भरत यादव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रदीप पाटील, सत्यजित भोसले, सौरभ देसाई, गिरीश रायबागे यांच्यासह अनेक उद्योजक उपस्थित होते.

कार्यक्रमात एमईएच्या कोल्हापूर चाप्टरच्या लोगोचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच मराठा समाजातील शेती, सेवा आणि उद्योग क्षेत्रातील वाटचालीचा आढावा घेणारी चित्रफीत दाखविण्यात आली. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले.

कुटुंबात उद्योग-व्यवसायाची चर्चा व्हावी
मराठा समाजातील प्रत्येक कुटुंबात उद्योग-व्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या संधींबाबत चर्चा होण्याची गरज आहे. अहंकार आणि परस्परांतील विसंवाद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास मराठा समाज उद्योगविश्वातही आघाडीवर जाऊ शकतो, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

उद्योजकांनी एकमेकांच्या संपर्कात रहावे
मराठा उद्योजकांनी सातत्याने एकमेकांशी संपर्कात राहणे आवश्यक आहे. नियमित भेटीगाठी घेऊन विचारांची देवाण-घेवाण करावी तसेच अनुभवी उद्योजकांकडून मार्गदर्शन घ्यावे. हा संवाद कायम राहिल्यास परस्परांच्या सहकार्याने औद्योगिक क्षेत्रात मराठा उद्योजकांचा प्रभाव वाढेल, असे विक्रम गायकवाड यांनी सांगितले.







