मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक सेमिकंडक्टर कंपन्यांसाठी भारताची दारे उघडली असून, त्यात फॉक्सकॉनसह अनेकांनी गुजरात, उत्तर प्रदेश आणि ओडिशामध्ये प्रकल्प सुरू करण्याचे काम हातीही घेतले आहेत. अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या वाटेवर होते. बोलणीही झाली, पण बड्या कंपन्या गमावून महाराष्ट्र अब्जावधी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो हातांना काम मिळवून देण्याच्या संधीला मुकला आहे.
महाराष्ट्र सरकारबरोबर करार आणि तामिळनाडूत गुंतवणूक
२०१५ मध्ये तैवानच्या फॉक्सकॉनसोबत ५ अब्ज डॉलर्सचा करार झाला होता. तो सुवर्णसंधी ठरला असता, पण गुंतवणूक प्रत्यक्षात उतरली नाही, अशाच तैवानच्या अनेक कंपन्या महाराष्ट्राच्या मार्गावरून इतर राज्यांत खासकरून तामिळनाडूत गेल्या आहेत. २०२३ मध्येही पाऊ चेन या फुटवेअर बनविणाऱ्या तैवानच्या कंपनीने महाराष्ट्र सरकारबरोबर करार केला होता. पण पाऊ चेनने तामिळनाडूत गुंतवणूक केली.
तामिळनाडूने बाजी का मारली ?
तैवान व दक्षिण कोरियन कंपन्यांसाठी उद्योग सहाय्यक आणि संस्कृती अनुकूल सल्लागार नेमले. विशेष आर्थिक क्षेत्र, “प्लग-अॅड-प्ले’ तयार भूखंड निर्माण केले. ‘Guidance Tamil Nadu’ नावाचे सशक्त गुंतवणूक प्राधिकरण तयार केले. सुलभ परवाना प्रक्रिया उद्योग मेत्री जोडली. उत्पादन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जलद अंमलबजावणी केली. पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या, वेगवेगळे क्लस्टर जलद गतीने निर्माण केले. जमिनी उपलब्ध करून दिल्या, तैवान क्लस्टर निर्माण केले. भारतातील सर्वोच्च इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार राज्य
तामिळनाडू हे भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार राज्य राहिले असून, वित्तीय वर्ष २०२३-२४ मध्ये ९.५६ अब्ज डॉलर्स इतकी निर्यात करत तामिळनाडूने राष्ट्रीय निर्यातीच्या ३२.८४% इतका वाटा उचलला. मागील वर्षाच्या तुलनेत ही निर्यात ७८% नी वाढली आहे. फॉक्सकॉन, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, सॅलकॉम्प, 3 पेगाट्रॉन यांसारख्या भारतातील पंधराहून अधिक प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार कंपन्या तामिळनाडूमध्ये कार्यरत आहेत.






