कोल्हापूर : जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान समुदाय आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी राज्यभरात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत समुदाय आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय मुंबई अंतर्गत ‘मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष’ व ‘धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने ही मोहीम राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे.

या शिबिरामध्ये उपलब्ध असणाऱ्या प्रमुख सेवा विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या, आवश्यक रक्त चाचण्या, ईसीजी तपासणी, इतर अनुषंगिक व उपचारात्मक तपासण्या आणि मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. ही शिबिरे यशस्वी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धर्मादाय आयुक्त, नगरपालिका प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि समन्वयकांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे.जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणा, सेवाभावी संस्था तसेच शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या सहकार्याने ही शिबिरे पार पडणार आहेत. यासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल कर्मचारी, निदानात्मक साधने व औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.







